ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १६० वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे. ग्रंथाच्या रूपाने केवळ ज्ञानसंचयच नव्हे, तर विविध उपक्रमांद्वारे ज्ञानोपासनेसोबत ज्ञानप्रसार करून एक सांस्कृतिक व्यासपीठ अशी आपली प्रतिमा संस्थेने समाजमनात निर्माण केली आहे. करवीरकरांच्या मनात या संस्थेबद्दल उत्स्फूर्त प्रेमासोबत अभिमानाची आणि आदारची भावना आहे.
१५ जुन १८५० रोजी कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी या नावाने लावलेल्या रोपट्याचा आता महावृक्ष झाला आहे. एकशे साठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासातील अनेक उलथापालथीतून ही संस्था समर्थपणे आणि भक्कम पायावर उभी राहिली, ती करवीरवासीयांच्या प्रेमामुळे. असंख्य जाणत्यांच्या प्रोत्साहनावर, आज नव्या सहस्त्राकात उभे असाताना असे दिसेल की दोन सहस्त्रकांमधील दुवा म्हणून कार्यरत असणार्या अशा चिरंजीवी संस्था महाराष्ट्रात फार थोड्याच आहेत. इतिहासच्या साथीदार, वर्तमानाच्या साक्षीदार आणि भविष्याच्या मार्गदर्शक अशा संस्थापैकी एक होण्याचे भाग्य या संस्थेला लाभले आहे, याची कृतज्ञतापूर्वक जाणीव आपणा सर्वांच्या मनात आहे. मराठी आणि अन्य भाषांतील व वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे एक लाख ग्रंथ जोपासत ही संस्था तब्बल एकशे साठ वर्षे कार्यरत आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिकांच्या जोपासनेमुळे संशोधनाच्या संदर्भ सामग्रीचे महाराष्ट्रातील एक महत्वाचे केंद्र असा या संस्थेचा अभ्यासकांत लौकिक आहे. अशा संस्थेशी सभासद म्हणून, हितचिंतक देणगीदार म्हणून आपणही आपले नाते जुळवून संस्थेच्या वाटचालीत योगदान द्यावे, ही मनापासून विनंती.
परिषदेपूर्वीच्या भारत भ्रमंतीत स्वामी विवेकानंदांची भेट.